आदिवासी बांधवांनी शासकीय सेवांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी विनय गौडा

 



आदिवासी बांधवांनी शासकीय सेवांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी विनय गौडा

 ◾लोहारा (ता. चंद्रपूर) येथे धरती आबा जनभागिदारी अभियानचे उद्घाटन


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : जनजातीय गौरव वर्षानिमित्त केंद्र सरकारने आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी ‘धरती आबा अभियान’ सुरू केले आहे. या अंतर्गत जिल्हाभरात विविध ठिकाणी 67 शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी या शिबिराच्या माध्यमातून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

लोहारा (ता. चंद्रपूर) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने आयोजित धरती आबा जनभागिदारी अभियानचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी श्रीमती भांगरे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पौळ, लोहाराच्या सरपंचा किरण चालखुरे, उपसरपंच शिलिक मरसकोल्हे, अनिल कुंटेवार आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री धरती आबा अभियानाची सुरूवात नुकतीच करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांसोबतच आदिवासी बांधवांसाठी असलेल्या विविध योजना एकत्रितरित्या ग्रामस्तरावर उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्ह्यात एकूण 67 शिबिरे घेण्यात येणार आहेत. यात प्रत्यक्ष ग्रामस्तरावर आधारकार्ड, रेशनकार्ड, आयुष्मान भारत कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, पीएम-किसान, जनधनखाते, काढणे अशा विविध सेवा देण्यात येणार आहेत. सोबतच आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सोयीसुविधा देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे त्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ग्रामस्तरावरच या सुविधा शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, लोहारा येथे धरती आबा जनभागिदारी अभियानचे चांगले आयोजन प्रकल्प कार्यालयाने केले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घरकुल योजना, जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी व इतर योजना गरजू लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकेतून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावे समाविष्ट आहेत. यात चंद्रपूर प्रकल्प कार्यालयांतर्गत 115 तर चिमूर प्रकल्प कार्यालयांतर्गत 52 गावांचा समावेश आहे. या अभियानात 17 शासकीय विभागाच्या 25 प्रकारच्या सेवा देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 15 ते 30 जून या कालावधीत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. लोहारा व परिसरातील आजुबाजूच्या गावक-यांनी शिबिराचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रे काढून घ्यावीत, असे आवाहन श्री. राचेलवार यांनी केले.

यावेळी मान्यवरांनी विविध स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका जयू राऊत यांनी तर आभार मुख्याध्यापक रामदास खवशी यांनी मानले. कार्यक्रमाला अधिकारी – कर्मचारी तसेच गावकरी उपस्थित होते. 

नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप : यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रियंका मरापे, पल्लवी बोधे, आबाजी नैताम, सुनील कुमरे यांना शिधापत्रिका वाटप तर पोचू सोयाम, अशोक मेश्राम, विशाल गेडाम, प्रफुल देवगडे, विजय भोगेकार यांना वनहक्क अंतर्गत सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.




Post a Comment

0 Comments