शेतक-यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून द्या - पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे बँकांना निर्देश

 



शेतक-यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून द्या - पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे बँकांना निर्देश

 ◾दोन महिन्यात जिल्ह्यात 68 टक्के पीक कर्ज वाटप

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी गुंतला असून त्याने शेतीची कामे सुरू केली आहे. हा हंगाम शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. बि- बियाणे, खते, किटकनाशके आदी कृषी निविष्ठा घेण्यासाठी शेतक-यांना आज पीक कर्जाची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर पीक कर्ज मिळेल, या दृष्टीने सर्व बँकांनी योग्य नियोजन करावे, पीक कर्जाबाबत शेतक-यांची कुठलीही तक्रार येता कामा नये, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे खरीप हंगाम पीक कर्जवाटपाबाबत बँकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राजू नंदनवार, नाबार्डचे महाव्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) चंद्रशेखर बोधड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्यासह बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात खरीप हंगामाकरीता 1150 कोटी आणि रब्बी हंगामाकरीता 100 कोटी असे एकूण 1250 कोटी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, शेतकरी हंगामाच्या तयारीला लागला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतक-यांना वेळेवर पीक कर्ज न देण्याचे प्रमाण जास्त आहे, तशा तक्रारी दरवर्षी प्राप्त होतात. या वर्षी कोणतीही तक्रार येऊ देऊ नका. अतिशय संवेदनशीलपणे आणि सकारात्मकतेने शेतक-यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून द्या.

पीक कर्जापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. महत्वाचे म्हणजे शेतकरी व इतर पात्र लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असतो. डीबीटीच्या माध्यमातून या योजनांचा निधी शेतक-यांच्या खात्यात जमा होतो. योजनांच्या निधीतून पीक कर्जाची रक्कम बँकांनी कपात करू नये, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राजू नंदनवार यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यात खरीप हंगामाचे उद्दिष्ट 1150 कोटी रुपयांचे असून आतापर्यंत 71033 शेतक-यांना 776 कोटी 57 लक्ष रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. ही टक्केवारी 68 आहे. यात सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा असून सहकारी बँकेने 63363 शेतक-यांना 685 कोटी 88 लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.





Post a Comment

0 Comments