अनिष्ठ रूढी परंपरा व कर्मकांडाच्या बेड्या तोडल्याशिवाय कोणीही बौद्ध होऊ शकत नाही - धम्मचारी पद्म्बोधी
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : सत्याला सत्य म्हणून जाना आणि असत्याला असत्य म्हणून जाना असे बुद्ध सांगतात. कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. परंतु आपण त्याची कारणमीमांसा न करता अंधश्रद्धेत फसतो आणि कर्मकांडामध्ये लिप्त होतो. नजर लागणे, काळे धागे बांधणे किंवा लहान मुलास काजळ लावणे, पहिल्या पौर्णिमेला नुकतेच लग्न झालेल्या मुलीला पती जवळ राहू न देणे यासारख्या अनेक बेड्यांमध्ये आजही आम्ही अडकलेले आहोत. खरं म्हणजे पौर्णिमेलाच महामायेला गर्भधारणा झाली व सिद्धार्थाचा जन्म हि झाला. म्हणून ह्या पावन पौर्णिमेला कोणाचे अहित कसे होईल? तेव्हा या अनिष्ठ रूढी परंपरा आणि कर्मकांडातून बाहेर पडल्याशिवाय आपण खरे बौद्ध होऊच शकत नाही.
असे स्पष्ट प्रतिपादन धम्मचारी पद्म्बोधी, नागलोक, नागपूर यांनी केले. भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती बल्लारपूर द्वारा आयोजित बुद्ध जयंती समारोह कार्यक्रमामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी धम्मचारी आर्थकिती, नागपूर आणि मा. प्रशिक बलवीर यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी धम्ममित्र शैलेंद्र शेंडे, समितीचे संचालक ताराचंद थूल आणि अध्यक्ष अशोक दुपारे मंचावर विराजमान होते. पाहुण्यांचा परिचय धम्ममित्र भास्कर भगत यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन धम्ममित्र संपत कोरडे यांनी केले. तर संचालन समितीचे सचिव जयदास भगत यांनी केले. याप्रसंगी १४ व्यक्तींनी देहदानाचा संकल्प केला. त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ऍड. पवन मेश्राम यांनी आपल्या मनोगतातून देहदानाचे महत्व विशद केले. त्रिशरण पंचशील आणि विधायक शिलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि धम्मपालन गाथेने सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला बल्लारपुरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कोषाध्यक्ष प्रकाश देवगडे, सहसचिव अंबादास मानकर, तुळशीदास खैरे, परमानंद भडके, रवी खोब्रागडे, प्रफुल खोब्रागडे, संदीप निखाडे, नितेश गायकवाड, वच्चलाबाई ताकसांडे, संगीता घोटेकर, शांताबाई मून, रसिका वाघमारे, करूणा भगत, विद्या भगत, नीता कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments