चंद्रपूर शहर विकासाच्या स्वप्नपुर्तीकरिता महापालिकेची सत्ता महायुतीच्या हाती सोपवा - हंसराज अहीर
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : वर्षांनुवर्षे ज्यांनी चंद्रपुरच्या विकासाची दैनावस्था केली त्यांच्या हातात चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता सोपवायची की, ज्यांनी या दैनावस्थेला वळणावर आणून शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढला व यापुढेही विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे ज्यांचे धोरण आहे त्या भाजप महायुती पक्षाच्या हातात सत्ता सोपवायची ह्याचा गांभिर्याने विचार करण्याचे आवाहन पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. 15 मध्ये आयोजित विजय संकल्प कॉर्नर सभेतून केले.
या सभेला राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, चिमुरचे आमदार बंटी भांगडीया व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व प्रभागातील महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. आज चंद्रपुर महानगरात जो काही विकास झालेला आहे त्याचे श्रेय भाजपा लोकप्रतिनिधी व या पक्षाच्या नगरसेवकांना आहे. आपण हे वास्तव विचारात घेऊन चंद्रपुरच्या विकासाचे स्वप्न घेऊन निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या भाजपा व महायुती उमेदवारांच्या विजयाचा संकल्प करून महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकवा असे आवाहन भाजपा नेत्यांनी आपल्या भाषणातून केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार हे खऱ्या अर्थाने लोकांचे सरकार आहे. कारण या सरकारच्या माध्यमातून लोकभावनांचा, सरकारप्रती असलेल्या अपेक्षांचा सन्मान करून लोकांना न्याय देण्याचा व सर्वच क्षेत्रात विकासाचा नवा किर्तीमान घडविण्याचे कार्य राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याने राज्यातील शहरांचा विकास हे सरकारचे प्रथम ध्येय असल्याने भाजपच्या हातात सत्ता सोपविल्यास भरीव निधीची उपलब्धता करीत चंद्रपूरचा कायापालट करू अशी ग्वाही या विजय संकल्प कॉर्नर सभेतून भाजप नेत्यांनी दिली.
दरम्यान हंसराज अहीर, किशोर जोरगेवार व आर्णीचे आमदार राजु तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत लालपेठ प्रभाग क्र. 16 मध्ये प्रचार सभा पार पडली. यावेळी भाजप नेत्यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून भाजपा महायुतीला लोकांच्या सेवेची व शहराच्या विकासाची संधी द्यावी असे आवाहन केले.







0 Comments