'त्या' व्हायरल पत्रावर तेली समाज संघटनांचा आक्षेप



 'त्या' व्हायरल पत्रावर तेली समाज संघटनांचा आक्षेप 

प्रांतिक तेली समाज संघटनेचे प्रकाश देवतळे यांची माहिती

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरातील मातोश्री सभागृहात तेली समाज संघटनांची बैठक पार पाडली. याच बैठकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर काँग्रेस उमेदवारांना तेली समाज संघटनांचा पाठिंबा देत असल्याचे पत्र समाज माध्यमावर व्हायरल झाले. मात्र, या व्हायरल पत्रावरून तेली समाज संघटनांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या पत्रावर अनेक संघटनांनी आक्षेप घेतला असून, या पत्रावरील काही स्वाक्षरी या बनावट आहेत. केवळ समाजाची दिशाभूल करण्याचा या पत्रातून झाल्याचा आरोप प्रांतिक तेली समाज संघटना तथा भाजपाचे नेते प्रकाश देवतळे यांनी रविवार(14 एप्रिल) ला एन डी हॉटेल येथे आयोजित पत्रपरिषदेत केला आहे.

देवतळे म्हणाले,दोन दिवसांपूर्वी तेली समाज चंद्रपूर या संघटनेच्या नेतृत्वात मातोश्री सभागृहात विविध तेली समाजसंघटनेची चिंतन बैठक आणि मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तशी निमंत्रण पत्रिका काढण्यात आली. या बैठकीत राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याबाबतचा कोणताही विषय न्हवता. मात्र, समाजसंघटनेची बैठक सुरू असताना तेथे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांची एन्ट्री झाली. आयोजकांनी तेली समाजाचा पाठिंबा इंडिया आघाडीला जाहीर केला,त्यामुळे विविध समाजसंघटेचे प्रतिनिधी बुचकाळ्यात पडले. अनेकांनी तेव्हाच याबैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही संघटनेच्या नेत्यांनी संपूर्ण तेली समाजाला गृहित धरून विविध समाजसंघटनांचा इंडिया आघाडीला पाठिंबा असल्याचे पत्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिले. हे पत्र खोटे असून तेली समाजाने अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही.हे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विविध संघटनांनी या व्हायरल पत्राबाबत निषेध व्यक्त केला आहे. या पत्रात तब्बल 12 संघटनांची नावे आहेत. मात्र, यातील बहुतांश संघटनांनी या पत्राशी आणि पत्रावर असलेल्या नावाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रावरील अनेक स्वाक्षरी या बनावट आहेत. काही संघटनांना विश्वासात न घेता त्यांची नावे टाकण्यात आली आहेत, अशी माहिती प्रकाश देवतळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी तेली समाजाचे नेते आशिष देवतळे, माजी नगरसेविका छबू वैरागडे, ज्योती भुते, गणेश बानकर, घनश्याम डुकरे, बाळू पिसे, दर्शन बेले, उमेश आष्टनकर उपस्थित होते.

बहुउद्देशीय संस्था म्हणजे समाज नाही - 

तेली समाजाच्या समर्थनार्थ जे पत्र दिले आहे,त्यावर 12 स्नेही व बहुउद्देशीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ताक्षर आहेत.या संस्था म्हणजे तेली समाज नाही.या पत्राच्या आधारे समाजात दुफळी निर्माण केली जात असेल तर,ते खपवून घेतले जाणार नाही असेही देवतळे म्हणाले.

काँग्रेसने काय दिले..?

काँग्रेसने नेहमी तेली समाजाला उपेक्षित ठेवले. अनेकवेळा निवेदन देऊन उपयोग झाला नाही. परंतू महायुतीनं मात्र तेली समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सुदुंबरेसाठी निधी दिला,समाजभवन करून दिले,संताजीची मूर्ती स्थापित केली.काँग्रेसने सांगावे त्यांनी काय दिले..?





Post a Comment

0 Comments