चंद्रपूरची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर विदर्भाच्या सर्व जागांवर भाजपाची विजयी सलामी - चित्रा वाघ यांचा दावा
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत आहे. बाईचे मत बाईला अशी विनवणी काँग्रेसच्या उमेदवार करीत असल्यातरी लोकांना आता विकास हवा आहे. मी अवघ्या मतदार संघात फिरले, सभा केल्या, महिलांना भेटले. तेव्हा बाईचे मत बाईला नाही, तर ते विकासाला आहे, हे सिध्द झाले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात प्रचंड विकासकामे केली आहेत.असाच विकास वणी व आर्णी येथील मतदारांनाही हवा आहे. विकास कामांवर महिलावर्ग खुश आहे. केवळ चंद्रपूरच नाही, तर पहिल्या टप्प्यातील विदर्भाच्या सर्वच्या सर्व जागी भाजपा विजयी सलामी देणार आहे, महायुतीचा दणदणीत विजय होईल,असा दावा भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे केला.
चंद्रपूर येथील पत्रकारांशी रविवार(14 एप्रिल) ला संवाद साधताना त्या म्हणाल्या, सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार सभेत जे वक्तव्य केले ते काही त्यांचे मनाचे श्लोक नव्हते. तर तो काँग्रेसचा नोंदवलेला गंभीर इतिहास आहे. जनतेवर जो अन्याय, अत्याचार त्या काळी आणीबाणी प्रसंगी झाला तो खरा आहे. नसेल तर काँग्रेसने त्याचे खंडन करावे. केवळ त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करू नये. त्याने कुठलाचा लाभ होणार नाही.
महिलांसाठी मोदी सरकारने खुप मोठी कामे केली आहे आणि महिला वर्गाला त्याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्यात मोठा उत्साह मला पाहता येत आहे. वणी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील महिलांशी मी संवाद साधला, तेथेही मोदी यांचा फोटो आणि कमळ चिन्ह ते ओळखतात हीच आमची मोठी उपलब्धी आहे.असे त्या म्हणाल्या.
0 Comments