संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते – डॉ. अनुप पालीवाल

 



संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते – डॉ. अनुप पालीवाल

◾छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने "विकसित विद्यार्थी – सक्षम राष्ट्र" व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरतेच मर्यादित न राहता आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, मैदानी खेळ आणि मोबाईलपासून दूर राहणे हे निरोगी जीवनाचे मूलमंत्र आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोगतज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. अनुप पालीवाल यांनी केले.

छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघ आयोजित स्व. स्वप्नील महावादीवार स्मृती प्रित्यर्थ "विकसित विद्यार्थी – सक्षम राष्ट्र" या व्याख्यानमालेमध्ये डॉ. पालीवाल प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. छोटुभाई पटेल यांच्या तैलचित्राला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन करताना डॉ. पालीवाल म्हणाले की, “सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचे फास्ट फूड आणि मोबाईलकडे वाढते झुकाव चिंताजनक आहे. हे शरीरावर व मनावर घातक परिणाम करत आहे. त्यामुळे आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा, मैदानी खेळ खेळावेत आणि पुरेशी झोप घ्यावी.”

डॉ. पराग जवळे यांचा प्रेरणादायी संदेश उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा या उक्तीप्रमाणे जर रोगप्रतिकार शक्ती वाढवली तर छोट्या छोट्या आजारापासून आपले व आपल्या परिवाराचे  संरक्षण करता येते. त्याकरिता आदर्श जीवनशैली पाळावी. विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठावे आणि रात्री लवकर झोपावे, सकाळी नियमितपणे व्यायाम करावा. उघड्यावरील पदार्थ खाऊ नये, शिळे अन्न टाळावे , आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा, कॅल्शियम युक्त पदार्थ खावे. तसेच आरोग्यासोबत स्वच्छतेची सुद्धा विशेष काळजी घ्यावी. विकसित राष्ट्र घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचे विकसित होणे गरजेचे आहे  असे मत या व्याख्यानमाले दरम्यान या उपक्रमाचे विशेष पाहुणे गोंडपिपरी  इथे कार्यरत तालुका आरोग्य अधिकारी आणि छोटूभाई पटेल हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. पराग जवळे यांनी व्यक्त केले.

पावसाळ्यात होणारे सामान्य आजार व त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे  कारण आपण मानसिकरित्या तंदुरुस्त राहू तेव्हाच आपण शारीरिक रित्या मजबूत राहू असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत (वैद्य) मॅडम, उपमुख्याध्यापक मानकर सर, निबांळकर सर, कुंमरे मॅडम माजी विद्यार्थी तथा अधिकारी डॉ. पराग जवळे, तसेच संघाचे सदस्य जितेंद्र मशारकर, धीरज साळुंके, सागर कुंदोजवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रभावी संचालन व आभार प्रदर्शन बम सर यांनी केले. या यशस्वी उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.




Post a Comment

0 Comments